साधारण ९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमची आर्थिक परिस्थिती जरा बेताची होती. तेव्हा मी वाकडजवळ एका छोट्या स्टार्टअप कंपनी मध्ये काम करत होतो. कंपनीने मला कामासाठी नवीन मॅकबुक घेऊन दिला होता आणि त्याचे पैसे मी माझ्या पगारातून हळू हळू फेडायचे असे ठरले होते.एकंदर सुरुवात चांगली होती
रोज दोन बस बदलून मी ऑफिसला जात असल्याचे पाहून ६ महिन्यांपूर्वीच आजोबांनी त्यांच्या पैशातून मला नवीन युनिकॉर्न बाईक घेऊन दिली होती. त्या आधी मला बाईक चालवता येत नसल्याने मी नवीन गाडीवरच शिकण्याचे सोपस्कार पार पाडले.
तो दिवस छान होता. दुपारीच मला आठ हजार पगार जमा झाल्याचा मेसेज आला होता आणि मी खुश होतो. साधारण रात्री ९ वाजता मी काम आटपून घरी निघालो. बाईक चालवत मी विशालनगर जवळ आलो असता माझा फोन वाजला म्हणून मी गाडी थांबवली आणि फोनवर बोलून फोन ठेऊन दिला. गाडी पुन्हा चालू केली आणि काही मीटरच अंतर गेलो असेल तितक्यात भटक्या श्वान पथकाने माझ्या गाडी मागे धावायला सुरुवात केली. माझ्या डाव्या बाजूने श्वानांचा मोठा झुंड त्वेषाने गाडीवर चालून येत होता. नकळत मी गाडी उजव्या बाजूला तिरकी तिरकी चालवत गेलो आणि मागून येणाऱ्या एका कारला माझी गाडी घासून गेली. मी कसाबसा सावरलो. उडालेला तो गोंधळ पाहून श्वानपथकाने तेथून काढता पाय घेतला. ती कार पुढे जाऊन थांबली तसा मी पण तिच्या शेजारी जाऊन थांबलो. कारण कारचे बरेच नुकसान झाले असावे असा अंदाज होता. कारमधून चालक बाहेर आला. कारवरच्या पार्किंग स्टिकरवरून तो माणूस टेक महिंद्रा कंपनी मध्ये कामाला असल्याचे दिसले.
तो माणूस `अरे काय रे! कशी गाडी चालवतोस. काही लागले नाही ना?`
मी `नाही, काही लागले नाही...मी बरोबर जात होतो हो पण कुत्री माझ्या अंगावर आली आणि गाडी तिरकी गेली. मी तरी काय करणार`.
तो माणूस `अरे लागलं नाही म्हणुन ठीक पण माझ्या गाडीचे किती नुकसान झाले पहिले का?`
आम्ही दोघे त्याच्या गाडीजवळ गेलो तर दिसले की डाव्या बाजूचे दोन्ही दरवाजे चेम्बुन खोलवर ओरखडा आला होता. नुकसान तर बरेच होते आणि कमीत कमी ६-७ हजार खर्च आहे हे सहज दिसत होते (एवढ्या खर्चासाठी कोणी इन्शुरन्स वापरत नाही). माझ्याही गाडीचे खर थोडं नुकसान झालं होत पण ते कारच्या नुकसानीपुढे कमीच होत.
तो माणूस `आता काय करायचं सांग?`
मी एकदम गर्भगळीत झालो आणि हेल्मेट काढून उसासा घेतला. एकतर मी नवशिका चालक होतो आणि चुक तर माझीच होती. मनात विचार आला याने जर माझी बॅग उघडून पहिली तरी याला वाटेल कि मी एवढे महागडा लॅपटॉप वापरतो म्हणजे मी सगळा खर्च करायला पाहिजे. मी शांत खाली नजर घालून उभा होतो.
तो माणूस `बोल ना आता काय करायचं?`
उसने अवसान आणुन मी बोललो `मी दोन अडीच हजार देऊ शकतो, त्यापेक्षा नाही जमणार.`
तो माणूस `अरे पण नुकसान जास्त आहे. तीन हजार दिले तरी पण नाही भागणार.`
मी `हे बघा खरंच माझ्याकडे जास्त पैसे नाहीत. आणि जे आता मी देणार ते पण मला एटीएम मधून काढावे लागतील. आता लगेच देतो मी पैसे`
तो माणूस `इथे कुठे आहे एटीएम पण?`
मी ` आहे पुढे चला मी देतो. आणि हो हे हेल्मेट ठेवा मी पळून नाही जाणार`.
तो माणूस `हेल्मेट नको, तु चल पुढे मी येतो मागून`.
साधारण ४०० मीटर वर मी नशिबाला दोष देत गाडी चालवत एटीएम पर्यंत गेलो. गाडी थांबवून एटीम पैसे काढायला गेलो आणि तिथेच मला रडू कोसळले. कसबस सावरून पैसे काढून बाहेर आलो. तो माणूस गाडीतून उतरून माझी वाट पाहत उभा होता.
मी पैसे त्याच्या हातात दिले आणि त्याने ते मोजून घेतले. मोजून झाल्यावर त्याने शांतपणे ते पैसे माझ्या शर्टच्या खिशात ठेवले आणि बोलला
`पैसे राहू देत! विचार कर कि जर तुला काही झालं असत तर काय केलं असतंस. तुझा जीवसुद्धा गेला असता किंवा अपंग झाला असतास. गाडी व्यवस्थित चालवत जा बाकी काही नाही. खरंच तुला लागलं नाही ना?`
मी ` नाही काही लागलं नाही`.
मला अजून समजूतदारपणाच्या चार गोष्टी सांगून तो माणुस गाडीत बसून निघून गेला. मी थोडे थांबून हेल्मेट घातलं आणि देवाचे आभार मानत घरी निघालो.
आभार याकरिता मानले नाही कि माझे पैसे वाचले तर याकरिता कि मला त्या अपघातामध्ये काही झालं नाही म्हणून. तो देवमाणूस कोण होता ते माहित नाही. काही कृती खूप छोट्या असतात पण त्या आपल्याला आयुष्यभराचा धडा शिकवून जातात.
No comments:
Post a Comment