साल २०२० च्या डिसेंबर महिन्यात माझा चुलत भाऊ आणि मी सासवड भागात फिरायला गेलो. चांगावटेश्वर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आणलेला डबा खात असताना तिरुपती बालाजी मंदिरातला लाडु खायची माझी तीव्र इच्छा झाली. येताना केतकावळे (प्रति बालाजी क्षेत्र म्हणुन प्रसिद्ध) गावाचा दिशादर्शक बोर्ड पहिल्याचा परिणाम म्हणता येईल. तिथेहि तिरुपती मंदिरासारखा मोफत लाडु प्रसाद मिळतो असे ऐकले होते (मी अजुन तिरुपतीला गेलेलो नाही)
मग काय ठरले कि ईथुन आता केतकावळेला जायचे. खराब रस्ता पार करत आम्ही केतकावळ्याला पोहोचलो. गाडी तळावर जाताजाताच कोणी लाडू हातात घेऊन येत आहे का किंवा खात आहे का हे पाहात होतो. 😂 पण कोणीच लाडू खाताना किंवा मिरवताना दिसत नव्हते. मनात शंका आलीच आणि तिथे गेल्यावर समजले कि कोरोनानंतर आता लाडू प्रसाद वाटप कायमचे बंद केले आहे.
आमची घोर निराशा झाली. आता तोंड लाडू खायला खवळले होते म्हणून आजूबाजूला पहिले पण फक्त एकाच ठिकाणी लाडु विक्रिला होते. आणि ते सुद्धा एकदम सुमार दर्जाचे होते. आम्ही तसेच मनात लाडवाची आस ठेऊन घरी बाणेरला निघुन आलो.
घरी येऊन फ्रेश झालो आणि हॉल मध्ये आलो तर आई म्हणाली “अरे शेजारचे काका तिरुपतीला जाऊन आले आज; काकु बालाजीचा प्रसाद देऊन गेल्या आहेत. बघ ओट्यावर ठेवलाय”. आणि बघतो तर काय तिरुपती बालाजीचा लाडु प्रसाद.
तिरुपती बालाजी आणि अन्नपुर्णा एकत्र प्रसन्न झाल्यासारखे वाटले. योगायोग म्हणा किंवा काहीही म्हणा, थोडक्यात काय तर इच्छा तीव्र असेल तर देवसुद्धा मदत करतो हे काही खोटे नाही. 😊
No comments:
Post a Comment