Saturday, November 13, 2021

विवेचन - भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

- कवी ग्रेस

खाली दिलेला अर्थ हा कवितेचा मला उमगलेला अर्थ आहे, कवीला अभिप्रेत असलेला मुळ अर्थ आणि इतरांना त्यात सापडलेला अर्थ यात तफावत असू शकते. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी या गाण्यामागची मुळकथा माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितली आहे. त्यात त्यांनी शेवटी सांगितल्याप्रमाणे मोठ्या कवींची खासियत हि आहे कि त्यांच्या कवितांचे वेगवेगळे अर्थ निघत राहतात.

सदर कविता हि आई, वडिल, गुरु किंवा इतर मान्यवर वक्तीला संबोधुन असण्याची शक्यता जास्त आहे. सोयीसाठी आपण इथे कवितेचा नायक हा आईबद्दल बोलत आहे असे समजु. नायकाला आयुष्याचा झालेला अर्थबोध आणि आईची आठवण या संमिश्र भावना यातुन प्रकट झाल्या आहेत.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

प्रत्येक माणसाच्या मनात कोणते ना कोणते भय हे दडलेल असत. कधी ते अपयशाच तर कधी मृत्युचे. माणसाच्या मनातील भय हे एक क्षणदेखील त्याचा पिच्छा सोडत नाही. अशा क्षणाला नेहमी आपल्याला आपल्या आईची आठवण येते. आज नायकाची आई त्याच्या जवळ नाहीये आणि त्याच्या मनाला वाटून जात कि आई हवी होती. आईच असणं देखिल एक प्रकारचा आधार देऊन जात आणि मनातील भय नष्ट झाल्याची अनुभुती देतं तिच अपेक्षा नायक करत आहे.

मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

असं म्हणतात कि माणसाचा अंतःकाळ जवळ आला कि त्याला शहाणपण येत आणि पूर्वी शिकलेल्या किंवा अनुभवलेल्या गोष्टींचा अर्थ लागायला लागतो. कवितेचा नायक आयुष्याच्या संध्याकाळच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे आणि त्याला याक्षणी त्या व्यक्तिने दिलेली शिकवण उपयोगी पड़त आहे जी त्याला पुर्वायुष्यात बहुदा मौल्यवान वाटली नसावी.

ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया

झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

पूर्वी स्वार्थ बुद्धीने जगलेला नायक आता उघड्या डोळ्यांनी या जगाकडे पाहु लागला आहे. जणु त्याला आता साक्षात्कार झाला आहे किजीवन हे न संपणारे चक्र आहे. नायक चराचराशी आता एकरूप झाला आहे आणि सभोवताली असलेल्या गोष्टि त्याला शिकवत आहेत. तो झरे आणि धरणी कडे पूर्वीच्या नजरेने न पाहता एका नव्या दृष्टीकोनातून पाहात आहे. हे जे सर्व जीवित आहे त्याचा अंत आणि सुरूवात हि एकच आहे या अनुभवापर्यन्त येऊन तो आता पोहोचला आहे.

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला

सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

त्याच्या या अनुभव काळात त्याला आईने दिलेलं प्रेम हे निःस्वार्थ आणि निर्मळ असल्याची जाणीव होते. त्याची आई ज्या हळुवार आणि मृदुवाणीने नायकाला बाळ म्हणुन संबोधायची आणि त्याच्याशी हितगुज करायची हे तो आठवत आहे. तिच्याशी निगडित प्रत्येक गोष्ट त्याचे आयुष्य पावन करून गेली आहे. त्याची हि अवस्था वर्णन करण्यासाठी नायक पुराणकाळातील वनवासाला गेलेल्या सीतेचे उदाहरण देतो. वनवासात राम नसताना जसा त्याने दिलेला शेला राम सोबत असल्याची सीतेला जाणीव करून द्यायचा अगदी तसेच आईचे बोल त्याला या वनवासरूपी काळात साथ देत आहेत.

स्तोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

वास्तविक पाहता कोणत्याही स्तोत्रामध्ये अभिप्रेत देवतेचं गुणगान गायलेलं असत आणि सुखाची प्रार्थना केलेली असते. त्याप्रमाणे नायक आईचे स्तोत्राइतके पावन वर्णन करून गुणगान करत आहे पण हे करत असताना त्याच्या मनाला अतीव वेदना होत आहेत. आणि त्याचे दुःख तो लपवु शकत नाही. चांदणे जसे अनंत असते आणि आपल्याला ते संख्येत मोजता मोजता येत नाही तेवढे मोठे दुःख नायकाला झालेलं आहे.

No comments:

Post a Comment

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय...