Friday, November 12, 2021

वर्क फ्रॉम होम

मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. कोरोना काळातच नाही तर साल २०१६ पासून मी वर्क फ्रॉम होम करत आहे. २०१६ साली मी ज्या कंपनी मध्ये रुजू झालो होतो ती कंपनी मुळातच रिमोट कंपनी होती त्यामुळे मला वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऍनीवेअरची मुभा मिळाली. तरीसुद्धा मी जास्तीत जास्त घरूनच काम करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले.

माझ्या एकुणच अनुभवाची खालीलप्रमाणे विभागणी करता येईल

  • कामाचे स्वरूप
  • काम करण्याची पद्धत
  • आकलन
  • लॉकडाऊनचा काळ
  • सारांश

कामाचे स्वरूप

कामाच्या वेळेबाबतीत कंपनी खूपच लवचिक होती. एखादे सॉफ्टवेअर वापरून मॉनिटरिंग वैगेरे सारखी भानगड नव्हती. फक्त तुम्ही दिवसाचे किमान ८ तास प्रोडक्टीव्ह काम करायचे असे होते (काम प्रोडक्टीव्ह झाले कि नाही याचे मोजमाप आपले काम आणि त्याचा दर्जा पाहून ठरायचे). बराचसा संवाद हा टीकेटवर किंवा आपण म्हणू शकतो लेखी स्वरूपातच व्हायचा. प्रत्यक्ष कॉल ची गरज क्वचितप्रसंगी पडायची. आठवड्याचे ४० तास पूर्ण करायचे एवढे टार्गेट होते आणि ते आठवड्यात कधीही केले तरी चालत होते. शनिवारी आणि रविवारी शक्यतो काम करू नये असे सांगितले जायचे.

काम करण्याची पद्धत

रुजू झालो तेव्हा समजलं कि ईतर लोकं दुपारी २ किंवा ३ च्या सुमारास कामाला सुरुवात करून रात्री थोडं उशिरापर्यंत करत असतात. माझा आहार आणि जीवनशैली काटेकोर असल्याने या कामाच्या अनैसर्गिक वेळा पाळणे माझ्याकडून होणार नव्हते. म्हणून मी सकाळी ९ च्या दरम्यान कामाला सुरुवात करत असे. सुरुवातीला फायदा म्हणेज घरी दुपारी घरच्यांबरोबर जेवण करता येत असे. पण काही दिवसांनी लोकांना वाटू लागलं कि मी घरीच आहे तर उपलब्ध आहे आणि मला कोणी पाहुणे किंवा मित्र आले तरी त्यांना वेळ द्यावा लागायचा. आणि ८ तास काम करण्याच्या प्रयत्नात मी दिवस दिवस काम करीत बसू लागलो. नंतर मी स्वतःहून यावर बंधने घातली आणि लोकांना `मला काम आहे` हे सांगण्याची धिटाई अंगिकारली.

घरूनच काम असल्याने कामाच्या ठिकाणचे मित्र यांच्याशी प्रत्यक्ष संवाद तुटला. ज्यांच्यासोबत काम करत होतो त्यांना तर मी वर्षानुवर्षे पाहिलेदेखील नव्हते ( भारतातील लोक सुद्धा). कामाशिवाय बोललेलं इतरांना एवढं आवडायचं नाही. जो तो आपले दिवसाचे ८ तास संपवण्याच्या मागे होता. पुण्यातील जे इतर लोक होते ते आणि आम्ही प्रत्यक्ष भेटायचे असे ठरविले आणि मीटअप वैगेरेला भेटणे होऊ लागले. आणि तेव्हा कुठे समजले कि आपण सगळे एकाच नावाचे प्रवासी आहोत.

आकलन

कालांतराने कंपनीने पुण्यात एक छोटंसं ऑफिस खोललं आणि लोकांनी जमेल तेव्हा तिथे येऊन काम करावं असा त्या मागचा उद्देश होता पण सक्ती नव्हती. घरापासून लांब असल्याने येण्यात आणि जाण्यात वेळ जायचा. असं वाटायचे तेवढेच जर घरून तास भरले तर लवकर काम संपवू. आणि तिकडे जाणे पण कमी असायचे. या सर्वात एक गोष्ट लक्षात आली कि कामाची जागा बदलत राहिली तर कार्यक्षमता वाढत आहे. म्हणजे एकाच ठिकाणी बसून काम करायचे नाही तर जागा बदलत राहायच्या.आणि हो अगदी घरात सुद्धा जागा बदलायच्या. दुसरी गोष्ट समजली कि कोणत्याही प्रकारची खुर्ची हि दीर्घकालीन काम करण्यासाठी योग्य नाही. खुर्च्यांमध्ये पैसे घालवून फायदा नाही याची जाणीव झाली. दिवसभर कधी खुर्चीवर, कधी बेड वर तरी कधी सोफ्यावर बसुन काम करायचं. त्यामुळे शरीरावर एकाच ठिकाणी ताण येत नाही. त्यात मग स्टँडिंग डेस्कची संकल्पना समजली. ती पण फायदेशीर आहे. पण दिवसभर उभे राहून पण काम करणे चुकीचेच आहे. थोडक्यात काय तर बदल करत राहायचे.

साधारण २ वर्षांनंतर असे वाटू लागले आता बास. मला सगळ्यांपासून ब्रेक पाहिजे आहे. अगदी घरच्या सगळ्यांपासून. मग चुलत भावांबरोबर मस्त ७-८ दिवस दक्षिण भारतात रोडट्रिप करून आलो आणि एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. होत काय तर आपण घरून काम करतो आणि आपल्याला वाटू लागत सुट्टीची गरज नाही. आपण सुट्ट्या पण टाळायला लागतो. सुट्टी घेतली तरी ती भरून काढायच्या दृष्टीने परत इतर दिवस जास्त काम करावे असे वाटायचे. हे अगदी चुकीचे आहे. आवर्जून सुट्ट्या घ्याव्यात नाहीतर मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. काही कारण नसताना सुद्धा सुट्टी घ्यावी आणि निवांत बसून राहावे.

साल २०१९ मध्ये मी कंपनी बदलली. ती कंपनी रिमोट नसली तरी तिथेही आम्हाला घरून काम करण्याची मुभा मिळाली. कामाचे स्वरूप आधीच्या कंपनीमध्ये होते तसेच राहिले. त्यात फारसा फरक पडला नाही. कोरोनाआधी ऑफिसला पण अधून मधून जायचो बदल म्हणून. बरे वाटायचे. तिथे ईतर टीम मधले काही लोक मित्र पण झाले.

लॉकडाऊन चा काळ

लॉकडाउन लागला आणि सगळेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक घरून काम करायला लागले. जो तो मला म्हणून लागला `तुला काय सवय आहे. काही फरक नसेल पडत`. पण खरे पहिले तर ते तसे नव्हते. कोरोना आधी काम झालं कि फिरून ये, हॉटेलला जा किंवा एखादा कार्यक्रम असला कि त्याला जाऊन ये असे असायचे. हे लॉकडाउन मध्ये आजिबात नव्हते. लॉकडाउन मध्ये घरून काम करणे हि मुभा नव्हती तर सक्ती होती हे समजले तरी खूप आहे. घरून काम करण्याची सवय असल्याने इतर लोकांत आणि आमच्यात एक मूलभूत फरक होता कि आम्ही आमची उपलब्धता ठराविक वेळेत निश्चित केली होती.

घरी आहे म्हणून कधी पण काम कर असे आमचे नाही. त्यामुळे जेव्हा लोकं म्हणतात `कसं करतो रे तू घरून काम? आम्हाला तर कंटाळा आला आता` तेव्हा त्यांना मी सांगतो कि आता तुम्ही घरून काम करत आहे ते खर रिमोटवर्क नाही आहे. कोरोनासारख्या कठीण परिस्थिती मध्ये नोकरी जाईल या भीतीने लोक २४ तास काम करत आहेत. कंपन्यांना वाटलं आहे कि `वाह! हे मस्त आहे. लोकांची कार्यक्षमता वाढली आहे`. पण हे दीर्घकालीन टिकणारे नाही. आता बाजारात अनुभवी लोकांना नोकरीच्या खूप संधी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे कंटाळलेले लोक आता जुन्या कंपनीला रामराम करून चांगल्या पगाराची नोकरी पकडू लागले आहे. आता लोक नोकरी जाईल म्हणून घाबरणार नाहीत. आणि मग कंपनी म्हणेल कि `गड्या आपलं ऑफिस बर!`.

सारांश

माझ्या आधीच्या कंपनीचा मालक आम्हाला सांगायचा कि बरीचशी लोक ऑफिसला जाऊन काम करतात म्हणून तुम्हाला रिमोट वर्क करायला जमत आहे. तुम्ही काही तिर मारलेला नाही. रिमोटवर्क सर्व प्रकारच्या लोकांसाठी आजिबात नाही. मी तर म्हणतो विकेंड संपवून सोमवारी ऑफिसला आल्यावर सकाळची कॉफी घेत कुठे कुठे फिरलो याचे फोटो दाखवून आणि किस्से सांगून मनाला आनंद द्यायला ऑफिसचे सवंगडी हवेतच. नाही का?

No comments:

Post a Comment

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय...