इंजिनिअरिंगला असतानाची गोष्ट आहे. २००४-२००५ चा काळ होता. आमच्या वर्गातल्या गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या मुलांनी राजगड किल्ल्यावर मुक्कामी जाण्याची योजना आखली होती. गिर्यारोहणाची फारशी माहिती नसलेला मी पण उत्साहात त्यात सामील झालो. एखाद्या किल्ल्यावर मुक्काम करायची हि माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे मी आनंदात होतो.
आम्ही संध्याकाळच्या प्रहरी गडावर पोहोचलो. गडावर मस्त पावसाळी वातावरण होते. त्यावेळी बऱ्याचदा पद्मावती माचीवरील पद्मावती देवी मंदिरातच गिर्यारोहक मुक्काम करत असत. त्यादिवशी आमच्यासारखेच आणखी काही गिर्यारोहकांचे गट मुक्कामाला होते. आम्ही मंदिरात जिथे आमचे बस्तान मांडले होते तिथे खिडकीतून ढग आता शिरत होते, ते दृश्य अद्भुत होते. उजेड असे पर्यंत गडावर फिरण्याचा मस्त आनंद घेतला. रात्री सोबत आणलेलं डबे खाल्ले आणि गप्पा मारत मारत आम्ही निवांत ११ ला झोपलो.
रात्री अचानक मंदिराच्या दरवाजाची कडी कोणीतरी वाजवली. मला जाग आली आणि घड्याळ पहिले तर रात्रीचे २:३० वाजले होते. आमच्यापैकी बरेच जण जागे झाले होते पण कडी उघडायला कोणी गेले नाही. एका दुसऱ्या गटामधील मुलाने कडी उघडली. एक गिर्यारोहकांचा गट रात्री उशिरा गडावर आला होता. आम्ही थोडे पांघरून बाजूला करून पहिले आणि परत झोपलो. झोप लागते ना लागते तोच त्यांच्यापैकी एकजण आवाज करू लागला `आह आह आह हा...ओह ओह ओह हो`. एकतर पाऊस पडत होता आणि वातावरणात इतका गारठा होता कि सर्वांना वाटले कि याला चांगलीच थंडी भरली आहे. पण त्याचा तो आवाज वाढतच गेला. आणि थोड्या वेळाने तो बरळू लागला `सोडणार नाय! सोडणार नाय! लय दिवसांनी सापडलाय. सोडणार नाय!`. आमच्यातला धीट असलेला एक जण बोलला `झोपा रे हि उगाच नाटकी आहेत`. त्याचा हा ओरडण्याचा प्रकार थांबायचे काही नाव घेत नव्हता. त्यांच्या गटातील मुले पुढे येऊन त्याला विचारू लागली `महेश अरे महेश काय होतंय महेश?`. एव्हाना सगळे लोक उठून अंथरुणात बसून शांतपणे हे सगळं पाहत होते. यावर तो महेश (आता आम्हाला त्याचे नाव समजले होते) परत तेच सोडणार नायवाले बोल बोलू लागला. आम्ही पण हे सगळं नाटक आहे असे मानून बघत बसलो. देवीच्या मंदिरात कोणाला भूत लागू शकत नाही हा ठाम असलेला मी `शेजारी देव आहे, काही होत नाही` या विश्वासावर हे सगळे शांतपणे पाहत बसलो होतो.
आता मात्र तो महेश हातपाय झाडू लागला. त्यांच्या गटातील मुले त्याला आवरायला पुढे झाली तर त्या महेशने जोरात एकाला लाथ मारली आणि तो मुलगा थोडा दूर जाऊन भिंतीवर कोसळला. या सगळ्या झटापटीत त्या महेशच्या पायाला जखम झाली आणि रक्त येऊ लागले. तेव्हा आम्हला वाटू लागले कि हा नाटक करत नसावा. आता त्याच्या गटामधील मुले चिंतातुर झाली आणि त्याला बोलू लागली `महेश अरे महेश बघ बाहेर भाऊंची इंडिका आली चाल महेश`. याला दाद देईल तो महेश कसला. महेश आपला चालूच होता. `लै वर्ष झाली कोणी भेटला नाय`. आता इतर गटातील मुले सुद्धा यात सामील झाली आणि उपाय सुचवू लागली. कोणी सांगत होते देवीचा अंगारा लावा कोणी लिंबू उतरवायचे सुचवत होते. त्यात हि मुले कडेलोटाच्या रस्त्याने आले म्हणून हे असे झाले हि चर्चा सुरु झाली तर कोणी म्हणत होते ते येताना रात्री कच्च मांस घेऊन आले म्हणून असे झाले. जो तो आपापल्या परीने तर्क लावत होता तर कोणी उपाय सुचवित होते. पण कोणतेच उपाय काही काम करत नव्हते. शेवटी एकजण म्हटला "सकाळी ब्रम्ह मुहुर्तालाच याची सुटका होणार". आम्ही झोपी जायचा निर्णय घेतला आणि कसेबसे देवाचे नाव घेत निपचित पडून राहिलो.
सकाळी ६ वाजता जाग आली तेव्हा एक दोन मुले त्या महेशला घेऊन देवीच्या मूर्तीजवळ बसून होते आणि त्यांचे त्याला शांत करण्याचे प्रयत्न चालूच होते. मी पुन्हा झोपी गेलो आणि एकदम सकाळी ८ वाजताच उठलो. बरेचसे गट सकाळी लवकर उठून केव्हाच इतर माचींवर फिरायला निघुन गेले होते. आम्ही उठून आवराआवर केली आणि नाश्त्याला मंदिरातच बसलो. आता आमच्यातला जो तो त्या कालच्या प्रकाराची मस्करी करू लागला. `भाजी दे.. नाहीतर सोडणार नाय`. आणि नेमका तो कालचा महेश आमच्या शेजारीच झोपलेला होता याची जाणीव झाली. आम्ही नाश्ता आवरता घेतला आणि तिथून सटकलो. झाले ते खरे कि खोटे यावर आमच्या बऱ्याच चर्चा झाल्या पण त्यातून ठोस निष्कर्ष काही निघाला नाही.
या प्रसांगानंतर मी ५ ते ६ वेळा राजगडावर गेलो. त्यात २-३ वेळा मुक्काम देखील केला ( एकदा तर रात्री ११ ला चढाई सुरु करून गडावर आलो) पण परत असला काही अनुभव आला नाही.
No comments:
Post a Comment