Friday, November 12, 2021

आठवणीतील दिवाळी

आम्हाला लहानपणापासून दिवाळीला किल्ला बनवायची भारी हौस होती. त्याची तयारी सहामाही परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर त्याचदिवशी लगेचच चालू व्हायची. किल्ल्यासाठी लागणारी माती आणुन चाळण्याचे आणि दगड शोधुन आणायचे काम आम्ही इमाने इतबारे न थकता करत असू.

साधारण १९९७-१९९८ चा काळ असेल. त्यावेळी आमच्या दारालगत उंच ओटा होता आणि समोरच रस्त्यापलीकडे टेलरिंगचे एक दुकान होते. ओट्यावरच दाराशेजारी आम्ही किल्ला करत असु.

आम्ही भावंडांनी सुट्टी सुरु झाल्यापासून २-३ दिवस खपून मस्त किल्ला तयार केला होता. किल्ल्यावर पेरलेली अळीव उगवुन छान जंगल तयार झाले होते. दिवाळीसाठी २-३ दिवसच उरलेले होते. त्यादिवशी संध्याकाळी आई आणि आण्णा(वडील) हातगाडी घेऊन गेले होते. आम्हाला सर्वांना भेळ खायची इच्छा झाली. माझी बहिण भेळ आणायला दुकानात गेली. ती परत येताना जेव्हा ओट्याच्या पायऱ्या चढत होती तेव्हा तिच्या मागोमाग एक भला मोठा साप येत होता आणि नेमके ते दृष्य दुकानातुन टेलर मामांनी पाहिले. ओट्यावर येऊन तो साप सळसळ करत किल्ल्याच्या गुहेत शिरला. बहीण घरात आल्यावर टेलर मामांनी जोरात आवाज देऊन सांगितले कि किल्ल्यात साप गेला आहे आणि दरवाजा चांगला बंद करा. आम्ही दरवाजा बंद करून घरात मिळेल ते कापड लावून सापटी बुजवल्या.

बाहेर ओट्यावर हाहा म्हणता लोकांची मोठी गर्दी जमली, कोणीतरी आई आणि अण्णांना सुद्धा बोलावून आणले. गुहेत काठ्या ढोसून साप बाहेर येतो का हे पाहण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. पण शेवटी सगळे लोक म्हणाले कि किल्ला तोडावा लागेल तरच सापाला पकडता येईल. दाराआड उभ्या असलेल्या आम्हाला एवढ्या घाबरलेल्या अवस्थेतही किल्ला तोडायला नको असे वाटत होते पण त्याला आता इलाज नव्हता. बाहेर किल्ला छिन्नविछिन्न केला गेला आणि सापाला पकडण्यात..नाही नाही मारण्यात लोकांना यश आले. विजयीमुद्रेने सर्व लोक चर्चा करत पांगले. आम्ही दार उघडुन बाहेर आलो आणि किल्ल्याकडे पाहुन आम्हाला रडूच कोसळले. आई आणि अण्णांनी आमची समजूत काढली. आमची मेहनत वाया गेली होती. ती दिवाळी आमची किल्ल्याविनाच गेली.

त्यादिवाळीनंतर आतापर्यंत दर दिवाळीला या घटनेची आठवण होते. तेव्हा किल्ल्याबद्द्ल खूप वाईट वाटले होते पण आता असे वाटते कि जर तो किल्ला नसता तर तो साप थेट दारातून घरात आला असता आणि पुढे काहीही होऊ शकले असते.

थोडक्यात म्हणायचे तर किल्लेदार उपस्थित नसताना देखील तो किल्ला आमच्यासाठी लढताना धारातीर्थी पडला होता.

No comments:

Post a Comment

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय...