Friday, November 12, 2021

संतुलीत आहार

सुरुवातीलाच सांगु इच्छितो कि मी स्वतः आहारतज्ज्ञ नाही आणि कोणत्याही आधुनिक आहार पद्धतीचा पुरस्कर्ता किंवा विरोधकही नाही.

संतुलित आहार ज्याला इंग्रजीमध्ये बॅलन्सड डाएट असे संबोधतात हा नावातूनच सर्वकाही सांगून जातो. शरीराला आवश्यक अशा सर्व गोष्टीचे संतुलित प्रमाणात सेवन करणे म्हणजे संतुलित आहार घेणे असे आपण थोडक्यात म्हणु शकतो. सध्याच्या युगात जीवनपद्धतीमुळे उद्भवलेल्या आजारांमुळे आहार नियमन करण्याला प्रचंड महत्व प्राप्त झालेले आहे आणि ते बरोबरसुद्धा आहे.

पूर्वापार चालत आलेले समाजातील पिढीजात व्यवसाय पाहिले तर एक लक्षात येईल कि पूर्वीचा आहार हा आपल्या व्यवसाय प्रकारावर जास्त अवलंबून होता. व्यवसायातील कष्टानुसार आणि कार्यपद्धतीनुसार आहारातील पदार्थ बनविले जात आणि त्याचे संतुलन राखले जाई. वर्षानुवर्षांच्या अनुभवातून आणि संशोधनातुन हि आहारपद्धती विकसित झाली होती. आपण मराठी लोक मुख्यत्वे शेती व्यवसायात असल्याने आपला आहार हा शेतीसाठी लागणाऱ्या कष्टाला पुरक असा आहे.

गेल्या ४०-५० वर्षात आपले व्यवसाय आणि कामाचे स्वरूप कमालीचे बदलले आहे. पण त्यानुसार आपला आहार बदललेला दिसत नाही. आणि हि बाब अतिशय गंभीर आहे. आपण दिवसभर संगणकासमोर किंवा कार्यालयीन काम करणार असू तर शेतीच्या कष्टाला पूरक असा आहार आपल्याला फायद्याऐवजी तोटाच जास्त करून जातो. त्यामुळे आज कितीही घरातले वयस्कर लोक म्हणत असतील कि `आम्ही तुमच्या वयाचे असताना ४-४ भाकरी आणि त्यावर भरपूर भात खात असु` तरी ते आपल्याला आता अनुकरणीय नाही. त्यामुळे आहारात आपल्या जीवनपद्धतीनुसार केलेले बदल हे काही फॅड नसुन काळाची आणि शरीराची गरज आहे.

आपण मैदानी खेळ खेळत असू किंवा एखाद्या आजारावर उपचार घेत असू तर `काय खाऊ आणि काय खाऊ नको` हि गोष्ट पथ्यात मोडते आणि ती खूप महत्वाची सुद्धा असते. पण आज प्रत्येकजणच आहार नियमन करताना मी काय खाऊ आणि काय खाऊ नको याचा खुप विचार करतो किंवा गप्पा मारतो. आणि `मी किती खाऊ` याकडे साफ दुर्लक्ष करतो. कारण आजकालच्या `स्काय इज द लिमिट` मानणाऱ्या पिढीला कोणत्याही गोष्टीची सीमा मान्य नसते आणि कोणी ती घालायचा प्रयत्न केला तर ते बंड करून उठतात.

आपण पाहतो कि एखाद्या सुदृढ आणि धष्टपुष्ट व्यक्तीला लोक नेहमी प्रश्न विचारतात कि तू काय खातो. पण `किती खातो` हे मुद्दाम विचारत नाहित. आज व्हाट्सअँप फेसबुक सारख्या समाजमाध्यमातून लोक घरगुती उपायांचे डोस पाजत असतात. मग त्यात चमत्कारिक/गुणकारी अमुक किंवा आरोग्याला संजीवनी असलेले तमुक असे मेसेजेस सर्रास पाठविले जात असतात. जर कोणी म्हणाले कि आवळा आणि तुळशीची पाने आरोग्याला हितकारक आहे तर लोकांचा समाज असतो कि मग कितीही प्रमाणात खाल्ले तरी अपाय नाही. पण आवळा आणि तुळशीच्या पानांचे अतिसेवन आपल्या दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक असु शकते याकडे कोणी लक्ष वेधत नाही. हीच बाब जिमला जाणाऱ्या तरुणाईने सुद्धा अनुभवली असेल. आमुक गोष्टीत प्रोटीन आहे तर खा बिनधास्त... पण किती? आणि जास्त खाल्ले तर त्याचे काय परिणाम होतील?

संतुलित आहार नेमका `काय खाऊ आणि काय खाऊ नको` बरोबर `किती खाऊ` या गोष्टीवर घाव घालतो. आहारात कर्बोदकांचे,स्निग्धाचे, प्रथिनांचे, तंतुमय पदार्थाचे आणि जीवनसत्वयुक्त पदार्थांचे प्रमाण किती असावे हे संतुलित आहार सांगतो. आहार हा ऋतूशी सुसंगत असावा. बाराही महिने एकच गोष्ट खाणे शरीरासाठी उपयुक्त नाही.

वजन कमी करायला चपाती आणि भाता ऐवजी भाकरी खाल्ली पण त्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार नियमित नाही केले तर तुमचे वजन कमी होणार नाही तर वाढतच जाईल. पिझ्झा किंवा वडापाव शरीराला अपायकारक जरी सांगितले असले तरी एक पिझ्झाची स्लाईस किंवा एक झणझणीत वडापाव तुम्हाला वजनदार बनवून जाणार नाही. खरा प्रश्न आपण किती खातो याचा आहे.

संतुलित आहाराचे महत्व सांगायचे झाले तर आहार संतुलित नसणे म्हणजे विविध रोगांना निमंत्रण आहे. आमुक तमुक सेलिब्रिटी किंवा फिटनेस मॉडेल हे खातो म्हणून मी पण तेच खातो असे करणे हानिकारक ठरू शकते. आपल्या जीवनपद्धतीनुसार आणि कामाच्या स्वरूपानुसार संतुलित आहार ठरवण्यासाठी आपल्याला आहारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज भासते. आपला आहार हा संतुलित असावा आणि कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन टाळणारा असावा हे खूप महत्वाचे आहे. तसेच आपला आहार नैसर्गिक असावा आणि त्यात उगाच विदेशी गोष्टी खाण्याचा अट्टाहास नसावा जेणेकरून आपण त्या संतुलित आहारचे दीर्घकाळ पालन करू शकु.

No comments:

Post a Comment

रुचकर आस्वाद

पुणेकर माणुस खवैय्या आहे हे वेगळे सांगायला नको. जेवण म्हणजे फक्त उदरभरण हे पुणेकरांना मुळीच मान्य नाही. पुणेरी माणुस कुठेही गेला तरी तो खवैय...